Menu Close

धोरणात्मक निर्णयांची विहीत कालमर्यादेत अंमलबजावणी करावी – आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे निर्देश

मुंबई, दि. 04 : आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी निर्णय घेण्यात आले आहे. त्यामध्ये हिंदूहृदयसम्राट आपला दवाखाना, आरोग्य विभागाच्या रूग्णालयांमधून मोफत उपचार, महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या खर्चाची मर्यादा 5 लक्ष रूपये व केवळ अधिवास पात्रता ग्राह्य धरणे यांसारख्या महत्वाच्या निर्णयांचा समावेश आहे. असे धोरणात्मक निर्णय व यापूर्वी सूचीत केलेल्या धोरणात्मक बाबींची अंमलबजावणी विहीत कालमर्यादेत करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिले. आरोग्य विभागाच्या आयोजित आढावा बैठकीत आरोग्य मंत्री डॉ. सावंत बोलत होते.

राज्यात 700 ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्याचे उद्दिष्ट असून पुढील 15 दिवसात सर्व दवाखाने सुरू करण्याच्या सुचना देत आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रात उद्दिष्टाप्रमाणे आपला दवाखाना सुरू करावा. लाभ घेणाऱ्या रूग्णांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. त्याकरीता व्यापक जनजागृती करावी. राज्यात 1 मे पासून आतापर्यंत योजनेचा 8 लाख 26 हजार पेक्षा जास्त लोकांनी याचा लाभ घेतला आहे. लोकसंख्येनुसार आपला दवाखान्यांची संख्या गरजेनुसार वाढविण्यात येईल.

राज्यात निरोगी आयुष्य तरूणाईचे वैभव महाराष्ट्राचे ही 18 वर्षावरील पुरूषांची आरोग्य तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत 18 वर्षावरील सर्वांची आरोग्य तपासणी करावी. या मोहिमेची अंमलबजावणी विशिष्ट कालमर्यादेत असावी. मोहिमेचा दैनंदिन स्वरूपातील विभागनिहाय रुग्णांच्या तसेच केलेल्या तपासणीचा अहवाल ठेवावा. तपासणीमध्ये दुर्धर आजार किंवा शस्त्रक्रीयेची गरज असलेल्या रूग्णांना जवळच्या रूग्णालयात संदर्भीत करावे. तपासणी करताना विहीत नमुन्यात माहिती सादर करावी.

मोहिमेत जलद गतीने तपासणी होण्यासाठी नागरी भागात सूचीबद्ध रूग्णालये, खासगी रूग्णालयांचे सहकार्य घ्यावे. घरोघरी जावून पुरूषांची आरोग्य तपासणी करावी अश्या सूचना त्यांनी केल्या. जनआरोग्य योजनेचे दीड लक्ष रूपयांवरून पाच लक्ष रूपये खर्चाची मर्यादा सूचीबद्ध रूग्णालयांमध्ये गतीने राबवावा. धर्मदाय रूग्णालयांसाठी ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपविषयी जनजागृती करावी. धर्मदाय रूग्णालयांमध्ये आरोग्यदूतांची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचनाही आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी आज दिल्या.

आरोग्य मंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, राज्यातील आरोग्य विषयक चाचणी प्रयोगशाळांवर नियंत्रण आणण्यासाठी कायद्यात बदल करण्याच्या शक्यतेवर विचार करण्यात येईल. विविध ओषधांच्या खरेदीसाठी औषध खरेदी प्राधिकरण निर्माण करण्यात आले आहे. प्राधिकरणाची बैठकही घेण्यात आली असून प्राधिकरणात रिक्त जागांवर प्राधिकारी नेमावे. तसेच अन्य मनुष्यबळ उपलब्ध करावे असे निर्देशही त्यांनी दिले.

पुढील तीन महिन्यात विभागाची बिंदूनामावली तयार करून समाज कल्याण विभागाकडून मंजूर करण्याची कार्यवाही करावी. बिंदू नामावली मंजूर झाल्यानंतर विभागातील पदोन्नती प्रक्रिया गतीने राबविता येणे शक्य आहे. राज्याच्या निर्मितीपासून 8 आरोग्याचे विभाग आहेत. यामध्ये लोकसंख्यावाढ, जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्येची घनता आदी बाबींचा विचार करून राज्यात 19 विभाग निर्माण करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच गट ‘क’ व ‘ड’ संवर्गाच्या परीक्षा लवकरात लवकर घेण्यात याव्यात. सुंदर माझा दवाखाना अभियान पुन्हा राबविण्यात यावे.

अभियानांतर्गत रूग्णालयांची आतील व बाहेरील संपूर्ण स्वच्छता करण्यात यावी. आयुष्मान भव: मोहिमेदरम्यान 3 कोटी आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट देऊन नुकत्याच राज्यात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विभागाने भरारी पथक तयार करून रूग्णालयांची तपासणी करावी. यामध्ये स्वच्छता, औषधीसाठा, खाटांची स्थिती, फायर ऑडीट, स्ट्रक्चरल ऑडीट आदींचा समावेश असावा अशी आपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बैठकीत रूग्णालयांच्या बांधकामाची सद्यस्थिती माहिती, आयुष्मान भव: मोहीम, अवयवदान नोंदणी आदी विषयांवर देखील चर्चा करण्यात आली. बैठकीत आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार यांनी माहिती दिली. आयुष्मान भव: मोहिमेत अवयवदान नोंदणी व रक्तदान शिबिरांच्या आयोजनांमध्ये महाराष्ट्र राज्य देशात अव्व्ल असल्याची माहितीही आयुक्त श्री. कुमार यांनी दिली.

बैठकीत अपर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, सचिव नविन सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, संचालक (वित्त) व आरोग्य विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *